मी कसे शब्द
थोपवू माझे?
हिंडती सूर
आसपास किती!
(सुरेश भट)
आपण असतो आपली धून, गात रहा
आपण असतो आपला पाऊस, न्हात रहा
(मंगेश पाडगावकर)
कवितेऐवजी
रद्दी विकली असती
तर बरे झाले असते
निदान देणेकर्यांचे
तगादे तरी
चुकवता आले असते...
(नारायण सुर्वे)
सदस्य आगमन
अनुक्रमणिका
नवीन सदस्य
- 89
- 15
- 94
- sheessexPes
- GlarkarececeN
एक असंही प्रेम होतं…
एक असंही प्रेम होतं…
“अम्या असं कसं झालं रे… नक्की काय म्हणाली ती?”
“तुला सांगितलं, तेच म्हणाली. आणि त्यानंतर काही बोलण्यासारखं राहिलंही नव्हतं…’
“रागावू नकोस; पण मला पुन्हा एकदा सांगतोस काय झालं ते…’
“जवळपास गेला आठवडा आम्ही फारसे भेटत नव्हतो, हे तुला माहितीच आहे. तेव्हाही न भेटण्याचं तसं विशेष काही कारण नव्हतं; पण भेट घडत नव्हती हे खरं… काल तिचा फोन आला. आज नक्की भेटूया म्हणाली. मी नेहमीप्रमाणे तिला खेचू लागलो, तर ती खूप सिरीअस वाटली. आवाजावरून रडल्यासारखी वाटत होती. मी कारण विचारलं तिला… तर काहीच बोलली नाही… भेटल्यावर बोलू म्हणाली.’
“मग?’
“मग काय आम्ही भेटलो आज. काहीतरी गडबड आहे… काहीतरी विचित्र घडलंय किंवा घडणार आहे असं मला सारखं वाटत होतं… आज मनूला भेटताना नेहमीसारखं मस्त नव्हतं वाटत… म्हणजे इतर वेळी आम्ही भेटणार म्हटल्यावर जसं वाटायचं तसं नव्हतं वाटत. तुला सांगता येत नाहीये आत्ता… म्हणजे काय वाटत होतं ते शब्दांत नाही सांगता येत…; पण ते काहीतरी विचित्र फिलिंग होतं…’
“आम्ही आपल्या नेहमीच्या जागी भेटलो. तिचा चेहरा मलूल दिसत होता. फारसं बोलली नाही ती. मी विचारलं तिला, “काय प्रॉब्लेम आहे? काय झालंय नक्की?’ तर ती म्हणाली, “तेच बोलायला आलोय आपण; पण आधी काहीतरी खाऊन घे… नेहमीप्रमाणे उपाशीच असशील…’ मग आम्ही खायला मागवलं; पण ती नीट खात नव्हती. नेहमीप्रमाणे माझ्या डिशमधला घासही घेतला नाही तिनं… अन्न चिवडत बसली होती फक्त… तुला गंमत सांगतो, आज यांचं काहीतरी बिनसलंय हे आमच्या नेहमीच्या वेटरच्याही लक्षात आलं… त्यानं तसं विचारलं सुद्धा… माझं खाणं झाल्यावर ती म्हटली, “चल पुलावर जाऊ…’
काय झालंय हे माझ्या लक्षात येत नव्हतं आणि ती काही बोलायला तयार नव्हती… आम्ही पुलावर जायला निघालो. आज बिल तिनं दिलं… तुला ठाऊक आहे, नेहमी बिल मीच देतो. पण आज तिनं मला अडवलं आणि पैसे काढून दिले.
आम्ही पुलाकडे जायला निघालो. ती गाडीवर मागे बसली होती ना, तेव्हाही नेहमीसारखी नव्हती बसली. माझ्या खांद्यावरच्या तिच्या हाताची थरथर मला जाणवत होती… माझ्यासमोरचं प्रश्नचिन्ह वाढतच होतं…
आम्ही पुलावर पोचलो. मी गाडी लावली आणि आम्ही खाली बसलो. ती मान खाली घालून बसली होती. तिला म्हटलं, बोल आता… काय झालंय ते सांगून टाक पटकन. आता माझा जीव नको खाऊस… तिनं वर पाहिलं, तर डोळ्यात पाणी होतं तिच्या… तिनं पर्स उघडली आणि मला एक पासबुक दिलं. “हे तपासून घे,’ म्हणाली. तुला माहीत नाही… मी तिला प्रत्येक महिन्याला पैसे द्यायचो. तिनं एक अकाउंट उघडलं होतं, त्यात ती ते भरायची. त्यात स्वत:चीही भर घालायची. आमच्या संसारासाठीची बचत होती ती!
ते पासबुक हातात घेतलं आणि विचारलं, “काय भानगड आहे ही? मी तुला आजपर्यंत त्याबाबत कधी विचारलंय का? आणि आज एकदम हे काय?’
तिनं माझा हात हातात घेतला… तिचा हात थरथरत होता. मी त्यावर थोपटलं… पाच-दहा मिनिटं आम्ही तसेच स्वस्थ बसून राहिलो. मी तिला थोपटत होतो. तिनं मला विचारलं, “तुझा विश्वास आहे माझ्यावर?’
मी म्हणालो, “मग कोणावर ठेवू?’
ती म्हणाली, “आपण लग्न नको करायला… का ते विचारू नकोस. मला नाही सांगता येणार; पण आपण लग्न नको करायला…’
ती काय म्हणते आहे, हे मला कळलंच नाही कितीतरी वेळ… समजलं तेव्हा कशाचंच भान नव्हतं राहिलं. माझा तिच्यावर पूर्ण विश्वास होता आणि आहे. ती तसं म्हणते यामागे काहीतरी कारण नक्कीच असणार… पण असं कसं होईल… ती माझ्याशिवाय आणि मी तिच्याशिवाय कसे जगू शकू..? अक्षरश: काही समजत नव्हतं. कितीतरी वेळ आम्ही तसेच सुन्न बसून होतो नदीकडे बघत आणि ती नदी आमच्या दोघांच्या डोळ्यातून वाहात होती. बराच अंधार पडल्यावर आम्ही उठलो. तिला घरी सोडलं… आणि मी इथं तुझ्याकडे आलो…’
“अम्या, असं कसं होईल रे… ती का म्हणाली असं? तू विचारलं नाहीस तिला? मी विचारू का?’
“नको. तू काही बोलू नकोस. मीही कधीच विचारणार नाही. माझा विश्वास आहे तिच्यावर काहीतरी नक्की घडलंय…’
“अरे पण आपल्या ग्रुपला काय सांगायचं आता? आणि तू तुझ्या घरी काय सांगशील?’
राहुलच्या कोणत्याही प्रश्नाचं उत्तर देण्याच्या मनःस्थितीत अम्या नव्हताच. तो केव्हाच हरवून गेला होता. अम्या हरवला होता, त्यापेक्षा राहुल जास्त हरवला होता. हरवणारच होता तो… तो धक्काच तेवढा मोठा होता… अम्या आणि मनू काही थोडा काळ एकमेकांसोबत नव्हते. लहानपणापासून ओळखत होते ते एकमेकांना. फक्त ओळखत नव्हते, तर एकमेकांशिवाय ते कुठंही जात नव्हते की येत नव्हते. भांडणं आणि मारामाऱ्याही तेवढ्याच जोरदारपणे करायचे. बरं दोघांच्याही शाळा वेगळ्या आणि पुढे कॉलेजही वेगळी; पण एका शिबिरात ते भेटले आणि तेव्हापासून एकमेकांचेच झाले होते. हे जे काही आहे, त्याला प्रेम म्हणतात, हे त्यांना दहावीच्या सुटीत जाणवलं. ते पैसे साठवण्याचं खूळ तेव्हापासूनचं होतं. अर्थात त्यावेळी मनू एका पिगी बॅंकेत पैसे टाकायची. अम्याच्या कॉलेजचा ग्रुप हसायचा कधीकधी त्यांना… चेष्टाही करायचा; पण त्यांना त्यांच्या प्रेमाची, त्यांच्यामधील गाढ नात्याची जाणीवही होती. थोडीथोडकी नाही, 12-14 वर्षं दोघं एकत्र होते. कॉलेज संपल्यावर ती नोकरी करू लागली आणि हा व्यवसायात पडला. तेव्हाही याची अकाउंट्स तपासणं, तो जेवला की नाही पाहणं यावर तिचं पक्कं लक्ष असायचं. त्यांची ती शेवटची भेट होती, तेव्हाही तिनं आधी त्याला खायला लावलं होतं… अम्या कधी कसा वागेल, हे तिच्याइतकं कोणीच सांगू शकायचं नाही आणि तिच्याबाबत अम्याला विचारून घ्यावं. अम्या केव्हा रागावतो, त्याला काय काय आवडतं इथपासून ते आत्ता त्याच्या गाडीत किती पेट्रोल आहे, तो बाहेरगावी गेला, तर किती वाजता कुठे असेल, घरी किती वाजता पोचेल इथपर्यंत बारीकसारीक गोष्टी मनूला माहिती असायच्या. तशाच मनूच्या त्याला. दोघं एकमेकांची प्रचंड काळजी घ्यायचे. कॉलेज वेगवेगळी असली, तरी अम्यानं कधी कोणती लेक्चर्स बंक मारली, त्याचं कुठलं कुठलं कम्प्लिशन राह्यलं आहे, हे
मनूला बरोबर समजायचं. मग ती त्याच्या मागे लागून ते सारं करून घ्यायची.
या साऱ्या गोष्टी त्या दोघांच्या घरीही माहीत होत्या. म्हणूनच अम्याची तक्रार मनूकडे आणि मनूची अम्याकडे व्हायची. दोघांनी घरी स्पष्ट सांगितलं नसलं, तरी त्यांना कळत नव्हतं असं नाही. आणि त्यांचीही ना नव्हतीच! लहानपणापासून पाहात आले होते ते दोघांना… अगदी “मेड फॉर इच अदर…’
मग आता हे अचानक झालं काय, हे राहुलला समजेच ना… अर्थात जिथं अम्यालाच काही समजलं नव्हतं, तिथं राहुलला काय समजणार होतं? तरी राहुल विचार करतच होता; कारण तिच्या आणि त्याच्या अशा दोघांच्याही ग्रुपला त्यालाच उत्तर द्यायचं होतं. दोघांचा बेस्ट फ्रेंड होता तो. ते इतरांना “झाशा’ देऊन हुंदडायला गेले, तरी त्याला मात्र खरंखरं सांगून जायचे. एकदा तर त्याला मनूच्या वडिलांनी विचारलंही होतं… “अरे त्यांना म्हणाव सांगून टाका ना एकदा आम्हाला स्पष्ट. आम्ही काय नाही म्हणणार आहोत का? असे किती वर्षं फिरणार आहात नुसतेच. आमच्या नातेवाइकांनाही माहितीये सगळं. एकदा अक्षता टाकल्या, की आम्ही मोकळे… तू बोल रे त्यांच्याशी…’
राहुलपुढे हा एकच प्रश्न सतत उभा राहात होता, “हे अचानक काय झालं?’
दोन महिन्यातच मनूचं लग्न झालं. अम्या घरचं कार्य असल्यासारखा राबला त्या लग्नात. राहुलला, त्याच्या ग्रुपला, एवढंच काय पण तिच्या घरच्यांनाही बघवत नव्हतं त्याच्याकडे. तो आणि मनू एकमेकांसमोर यायचं टाळत होते. तसे आले असते, तर बांध नक्कीच फुटला असता… लग्न लागलं. पंगती बसल्या. सगळा ग्रुप शेवटच्या पंगतीत बसणार होता. तेव्हा अम्या बाहेर सटकला. पंगत उठली, तरी हा काही दिसला नाही कोणाला. मनूची नजरही त्यालाच शोधत होती. तो उपाशी राहिलेला तिला अजिबात चालायचा नाही… पण अम्या उगवला तो थेट पाठवणीच्या वेळी. अर्थात जेवला का नाहीस, हे विचारण्याची कोणाचीही हिंमत नव्हती, मनूचीदेखील… पाठवणीच्यावेळी मनू त्याच्यासमोर आली. नवऱ्याशी ओळख करून दिली. हा अम्या. माझा सगळ्यात जवळचा मित्र… त्यावेळी दोघांच्याही कंठात हुंदका अडला होता… फक्त दोघांच्याच नाही… त्यांना ओळखणाऱ्या साऱ्यांच्याच….
अम्याला सावरायला काही दिवस लागले. मनूला तेवढा तरी वेळ मिळाला की नाही ठाऊक नाही… मनू हनिमूनहून परत आली. आल्याआल्या तिनं पहिला फोन अम्यालाच लावला. तो सापडला नाही म्हणून राहुलला. अर्थात लग्नानंतर ती राहुलच्या संपर्कात होतीच. तिला अम्याची काळजी वाटत होती… पण अम्या काही तिला भेटायला तयार नव्हता. तिनंही त्याला वेळ दिला. शेवटी तिच्या लग्नानंतर दोन-तीन महिन्यांनंतर ते भेटले… त्याच नेहमीच्या जागी… नंतरही ते भेटत राहिले. अम्यासाठी चांगली मुलगी शोधण्याचा तिनं आता चंगच बांधला होता. त्याला कोणती मुलगी शोभेल, हे तिच्याशिवाय दुसरं कोण सांगू शकणार होतं?
पुढे अम्याही निवळला. त्याचंही लग्न झालं. आज अम्या आणि मनू आपापल्या संसारात रमले आहेत. दोघांनाही पोरंबाळं आहेत. भेटीगाठी आता खूपच कमी झाल्यात. म्हणजे सहा-सात महिन्यांतून एखादेवेळी वगैरे… तेव्हा मोबाईल नव्हते. आता आहेत. पण रोज फोन किंवा एसएमएसही नसतो. त्या दोघांना तशी गरजही नाही. ती दोघंही त्यापलीकडे कधीच गेली आहेत. आजही त्यांना एकमेकांबद्दल उत्तम माहिती असते. आपापल्या जोडीदारांशी ते प्रामाणिक आहेत. कदाचित काहींना शंका येते, त्यांच्या “इतर’ संबंधांबद्दल… अर्थात त्याबाबत इतरांना दोष देण्यातही अर्थ नाही. 12-14 वर्ष एकत्र राहिलेल्यांमध्ये असे संबंध निर्माण झाले नसतील, यावर कोण विश्वास ठेवणार? पण विश्वास ठेवायला हवा. ते दोघंही एकमेकांच्या मनामध्ये इतके गुंतले होते, की त्यांना या गोष्टी खरोखरच दुय्यम वाटत होत्या. कधीकधी ते दोघं तिच्या किंवा त्याच्या घरी एकटेही असत; पण गाणी, गप्पा किंवा मारामाऱ्या याशिवाय दुसरं काही त्यांच्यात घडलं नाही… कोणी यावर विश्वास ठेवो, न ठेवो, राहुल, त्या दोघांचा ग्रुप आणि माझा मात्र पक्का विश्वास आहे. आम्ही सारे त्यांचं तर उदाहरण सांगायचो साऱ्यांना… आजही सांगतो… हे असं का झालं, हे अजूनही साऱ्यांनाच कोडं आहे. अम्यानं तिला हा प्रश्न आजही विचारलेला नाही आणि ती आपणहून सांगेपर्यंत त्याला समजणारही नाही… अर्थात त्याला समजल्यानंतरही तो आम्हाला सांगेल, असंही नाही…
एवढ्या कथेवरून तुमच्या लक्षात आलंच असेल, की मी या साऱ्याचा साक्षीदार आहे. हे सारं माझ्यासमोर घडलंय… मी ते माझ्या परीनं अनुभवलंय. मागे संदीप खरेच्या कार्यक्रमाला गेलो होतो… तेव्हा एक गाणं ऐकलं
कितीक हळवे, कितीक सुंदर
किती शहाणे, अपुले अंतर…
त्याच जागी त्या येऊन जाशी
माझ्यासाठी, माझ्या नंतर…
या दोघांना किती चपखल लागू होतं नाही…
ही गोष्ट अनेक दिवस मनात होती. सांगावीशी वाटत होती. अम्या आणि मनूच्या सफल न झालेल्या (खरंतर असं कसं म्हणणार? लग्नात परिवर्तन न झालेल्या, असं म्हणता येईल फारतर…) प्रेमाची ही कहाणी आहे. कोणालातरी वाटेल, की ते दोघं आपापल्या जोडिदारांना फसवत असतील. तर तसंही नाही. आपापला संसार ते उत्तम रीतीनं करतात. आपापल्या संसाराला ते 100 टक्के देतात… आपलं प्रेम त्यांनी मनाच्या कुठल्यातरी खोल कप्प्यात अगदी अंधारात ठेवलंय एवढंच…
आज इतक्या दिवसांनी मला हे सांगावंसं का वाटलं ठाऊक आहे? ते दोघं पहिल्यांदा भेटले, त्याला नुकतीच 18 वर्षं पूर्ण झाली. आम्ही सारे, म्हणजे आमचा ग्रुप त्या दिवशी भेटतो. अगदी पहिल्यापासूनचा रिवाज आहे हा. नेहमीच्या अड्ड्यावर आम्ही भेटलो, प्रचंड दंगा केला. ती दोघंही हे सारं छान एन्जॉय करत होती. नेहमीप्रमाणे सारं वातावरण होतं. जाताना मात्र ती आमचीही नजर चुकवून चटकन निघून गेली… डोळे पुसत होती, असं प्राजू म्हणाली… इकडं अम्याचेही डोळे पाणावले होते… राहुलनं सांगितल्यामुळे मलाही माहीत होतं, म्हणून त्याला सहज विचारलं, “अम्या, त्या पासबुकाचं काय झालं रे?’ अम्या म्हणाला, “मी अजूनही तिच्याकडे पैसे पाठवतो. तीदेखील तिची भर घालून ते पैसे त्याच अकाउंटमध्ये ठेवते… अरे आमचं झालं नाही म्हणून काय झालं… आम्ही ठरवलंय पैसे साठवत राहायचे आणि एखाद्याचं पैशांमुळे अडत असेल, तर त्याला न बोलता देऊन टाकायचे… तिच्या एका मैत्रिणीला अडचण होती, तेव्हा आम्ही त्या कपलला ते पैसे देऊन टाकले. आमचा नाही झाला संसार… पण दुसऱ्याचा उभा राहू शकला, याचा आनंद आहेच की!!!
मी बऱ्याचदा नातेसंबंधांवर लिहीत असतो. कधी नॉस्टॅल्जिक होतो. प्रत्येक विषयानंतर माझी स्वत:ची काहीतरी कॉमेंट करतो. पण यावेळी नाही जमत तसं करायला. खरंतर आज इतक्या वर्षांनंतर हे लिहितानाही मी तो काळ अनुभवतोय आणि शब्द अडखळताहेत… होतंच… सॉरी आहेच… तसंच प्रेम आहे हे…
- दुर्गेश कदम् यांचे लेखन
- Login or register to post comments

नव्या प्रतिक्रिया
4 weeks 4 days ago
4 weeks 4 days ago
4 weeks 4 days ago
31 weeks 2 days ago
31 weeks 2 days ago
1 year 7 weeks ago
1 year 10 weeks ago
1 year 12 weeks ago
1 year 12 weeks ago
1 year 22 weeks ago